परभणी - जिल्हातील वेगवेगळ्या ठिकाणी मागील 3 वर्षात गहाळ झालेल्या मोबाईल्सचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या 9 दिवसांत विशेष मोहीम राबवून 25 लाखांचे 156 मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी पत्रकार परिषदेत दिली. (vnsnews24, feature )
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात 2021 ते 2023 वर्षांदरम्यान दाखल गहाळ मालमत्तेमध्ये गहाळ मोबाईल्सचा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी आढावा घेतला होता. त्यानुसार हरवलेल्या मोबाईल्सचा शोध घेवून ते संबंधितांस परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यातील सुमारे 25 लाखांचे 156 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
दि.5 ते 13 ऑगस्ट दरम्यान स्था. गु.शा.चे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण व सर्व पोलीस ठाण्यांच्या 36 अंमलदारांकरवी सायबर पोलीस ठाण्यामार्फत तांत्रिक सहाय्य घेवून ही विशेष मोहिम राबविण्यात आली.
जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये 2021 ते जुलै 2023 दरम्यान दाखल गहाळ मालमत्तांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिमे अंतर्गत परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून एकूण 25 लाख 27 हजार 913 रुपयांचे एकूण 156 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
0 Comments