- ओमप्रकाश यादव यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
- संकल्प स्वराज्य उभारणी फांऊंडेशनचा उपक्रम
परभणी ➡️ उदासीन शासकीय यंत्रणा आणि निष्क्रिय राजकारण्यामुळे गावखेड्यातील विकासाची गंगा सुरूच झाले नाही अशावेळी गावातील शिकलेल्या युवकांनी सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होऊन गाव बदलासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध चित्रपट लेखक तथा कवी अरविंद जगताप यांनी मंगळवार (दि.१६) रोजी केले.(vnsnews24, feature )
परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण कांतराव काका झरीकर, प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मंचावर प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.केदार खटिंग, पुरस्कार प्राप्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, डॉ.सविता वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता यादव, फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम निरस आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनच्या वतीने उत्कृष्ट ग्रामोत्थान, माझं गाव माझं तीर्थ, हागणदारी मुक्त गाव अशा योजना यशस्वी राबविल्याबद्दल ओमप्रकाश यादव यांना यंदाचा संत तुकडोजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देत प्रदान करण्यात आला.
उपस्थितांशी संवाद साधताना अरविंद जगताप पुढे म्हणाले, हायवे रस्ते होत आहेत पण गावाकडचे रस्ते होत नाहीत याचे आत्मपरीक्षण गावच्या युवकांनी केले पाहिजे. आपण यंत्रणेला कधीच प्रश्न विचारत नसल्याने राजकीया आणि शासकीय यंत्रणा बकाल होताना दिसत आहेत. आपण एखादा माणूस उभा केला तर तो धोका देणार हा त्याचा सहज स्वभाव आहे पण एखादं झाडं उभं केल तर ते आपल्याला धोका कधीच देत नाही.त्यामुळे एका व्यक्तीने किमान एक तरी झाडं लावलं पाहिजे. आजकाल सामाजिक कार्याचा बाऊ जास्त केला जातो. असे न होता संयमाने आणि प्रसिद्धी न करता आपले संथगतीने कार्य चालू ठेवले तर काहीतरी चांगले निर्माण होते. आपल्या गावाचा विकास हा बाहेरचा कोणी करीत नसतो तर आपल्याला करावा लागतो असे मत त्यांनी केले. अरविंद जगताप यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात कांतराव काका झरीकर म्हणाले, या फाऊंडेशनने आजतागायत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी राबविले आहेत. समाजाची मदत करण्यासाठी आज समाजात देणारे लोक अनेक आहेत पण योग्य दिशेने त्याचे व्यवस्थापन करणारे कमी आहेत. सदरील फाउंडेशन देणारे आणि गरजू लोकांमधला महत्वाचा दुवा आहे.
यावेळी रुग्णसेवा माऊली वाघमारे, गोविंद दुधाटे आणि रामप्रभु निरस यांचा ही सत्कार करण्यात आला. पुरस्काराच्या मानपत्राचे लेखन आणि वाचन फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ.जयंत बोबडे यांनी केले. यावेळी दादासाहेब टेंगसे, जिप सदस्य राजेश फड, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, संजय ससाणे, प्राचार्य नितीन लोहट, विठ्ठल भुसारे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रा.सुभाष ढगे, सूत्रसंचालन उषा लोहट तर आभार श्याम निरस यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नितीन चौधरी,शारदा सामाले, अरुण कदम,गजानन देशमुख, सखाराम रनेर, प्रदीप यादव, एकनाथ देवकर, उदय भिसे, बापूसाहेब जाधव, आदींनी पुढाकार घेतला.
0 Comments