स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक : आंदोलनाचा इशारा
परभणी ➡️ जिल्ह्यात हरभरा काढणीला एक महिन्यापासून सुरुवात झाली असून हरभरा खरेदी केंद्रावर मात्र अद्याप शासनाची नोंदणीच सुरू आहे. त्यामुळे शेतकर्यांना खूल्या बाजारात माल विक्री करावा लागत आहे. परिणामी शेतकर्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे येथील हरभरा खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात हरभराचे पोती फोडून आंंदोलन केले.
15 मार्चपासून हरभरा खरेदीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी नाईलाजास्तव बाहेर खुल्या बाजार माल विक्री करत आहेत. खुल्या बाजारात साधारणतः 4 हजार ते 4 हजार 200 रुपये एवढा भाव आहे. तर शासकीय हमीभाव हा 5 हजार 330 रुपये एवढा आहे.
त्यामुळे शेतकर्यांना एका क्विंटल मागे तब्बल 1 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्यांचे हे नुकसान भरुन काढावे व लवकरात लवकर हरभरा खरेदी केंद्र सुरु करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंडे, प्रसाद गरुड, रामभाऊ अवरगड, बाळासाहेब घटोळ, विजय कोल्हे, माऊली लोंडे, अंकुश शिंदे, हनुमान शिंदे, कृष्णा शिंदे, भास्कर खटिग, केशव आरमळ, अर्जुन बागल आदीं उपस्थित होते.
0 Comments