परभणी ➡️ शहरातील वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर दि. 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन आज शुक्रवारी (दि.24) दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.(vnsnews-24, feature, parbhani )
याप्रसंगी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.मोहन फड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, संयोजक आनंद भरोसे, माजी नगरसेवक शिवाजी भरोसे, राजेश देशपांडे, कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. स्व. अॅड. शेषराव धोंडजी भरोसे (आबा ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने येथे तिसर्यांदा भव्य राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्ह्यातील 5 प्रगतशील शेतकर्यांचा गौरव करण्यात आला.
कृषी संजीवनी महोत्सवामध्ये महिला बचतगट मेळावा, सोयाबीन, ऊस, हरभरा, दुग्धव्यवसाय, पाणी व्यवस्थापन या विषयावर पीक परिसंवाद होणार आहे. या महोत्सवात शेतकर्यांना औजारांची प्रात्यक्षिके पाहायला मिळत आहे. कृषी संजीवनी महोत्सव हे 10 एकरात होत असून यात 5 दालने उभारण्यात येत आहेत. हे दालन अत्याधुनिक असून डोम पद्धतीचे भव्य जम्बो मंडप उभारले आहेत. तसेच प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले आहेत. या प्रदर्शनात कृषी उत्पादनाचे अनेक स्टॉल सहभागी झाले आहेत.
कृषी प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, आधुनिक तंत्रज्ञान, बी बियाणे, शेंद्रीय शेती पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशु खाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिबक सिंचन, सोलर उत्पादने, महिला बचत गटाची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू धान्य महोत्सव असे अनेक स्टॉल लावण्यात आले आहेत. याच बरोबर फूड कॅन्टीन,लहान-मुलांसाठी विविध खेळणी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.
0 Comments