देगलूर ➡️ सामाजिक कार्यकर्ता हा समाज हिताच्या पोटतिडकीतून उदयाला येत असतो. परंतु आजकाल स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांची वाढती संख्या व त्यांची द्वेषमूलक भूमिका समाजहितासाठी अत्यंत विघातक ठरत असल्याचे मत महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिनानिमित्त आज वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात म. गांधी प्रतिमापूजन व अभिवादन करताना प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य अवधाने संजय, उपप्राचार्य डॉ. भडके दिलीप, उपप्राचार्य डॉ. कुकाले प्रकाश, प्रा. ठोसरे अनिल, एन.एस.एस. समन्वयक डॉ. माळगे भीमराव व जांभळीकर सतीश यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. विजय कुलकर्णी म्हणाले की, महात्मा गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान विश्वव्यापी असून जगात अनेक देशात त्याचा प्रभाव जाणवतो.
शस्त्रांनी केलेल्या हिंसेपेक्षा शाब्दिक हिंसा ही अधिक घातक असते परंतु समाजातील काही स्वयंघोषित तथाकथित सामाजिक कार्यकर्ते समाजात दुही, द्वेष, तेढ निर्माण करून शाब्दिक हिंसेद्वारे द्वेषमूलक वातावरण निर्माण करीत आहेत, महापुरुषांच्या नावाचा वापर करून आपणच केवळ या महापुरुषाचे अनुयायी आहोत असा ढोंगीपणा सामाजिक कार्यकर्ते वारंवार करत असतात.
ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये फार मोठी शोकांतिका असल्याची खंतही प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माळगे भीमराव यांनी केले तर आभार जांभळीकर सतीश यांनी मानले.
0 Comments