परभणी ➡️ शहरातील अहिल्याबाई होळकर नगरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मनपा प्रशासनाने त्वरीत रस्त्यावर मुरुम टाकावा आणि या भागात मुलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने आज 28 जुलै रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मागच्या 25 वर्षापूर्वी वसलेली ही कॉलनी असून येथील सर्व प्लॉटिंग एन.ए.लेआऊट झालेले आहेत. या परिसरातील नागरिकांनी मालमत्तेचे बेटरमेंट चार्जेस व नियमित घरपट्टी भरत असताना देखील अहिल्याबाई होळकर नगरातील रस्त्यांनी व गटारांची अवस्था दयनीय आहे. नियमित मालमत्ता कर भरणार्या मालमत्ताधारकांना परभणी शहर महानगरपालिकेने नागरी सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. परंतु मनपा प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांच्या शिष्टमंडळासह आज परभणी महानगरपालिकेचे उपायुक्त रणजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. अहिल्याबाई होळकर नगरातील कच्चा रस्त्यांवर तात्काळ मुरुम टाकून रस्ते व्यवस्थीत करावे, नगरातील गटारांची तात्काळ साफसफाई करुन ही साफसफाई नियिमत चालू ठेवावी, परिसरातील नागरिकांना मनपाने पाईपलाईन टाकुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे व परिसरात नियमित घंटागाडी सुरु करुन प्रत्येक घरातील कचरा संकलित करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आलेल्या आहेत.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवी घोडके, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख ज्ञानोबा काळे, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर, सय्यद अरमान, दीपक कुचे, गोदावरी दीपके, मिना जाधव, जयश्री पारवे, शामल सदावर्ते, धृपदाबाई खिल्लारे, प्रजा तुरुकमाने, अनुराधा थोरात, अर्चना मुनेश्वर, कौशल्या कळसे, छाया खांडके इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments