परभणी ➡️ जिल्ह्यातील शिक्षकांनी होतकरू, गोरगरीब विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या आरोग्य व शिक्षणावर भर दिल्यास येणाऱ्या काळात सक्षम व उदयोन्मुख पिढी घडण्यास मदत होऊ शकेल असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
आज दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी परभणी येथील कन्या शाळेमध्ये जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकरी व केंद्रप्रमुख यांच्या संवाद बैठकीचे आयोजन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्रा.) ओमप्रकाश यादव, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, वृक्ष चळवळीचे गटप्रवर्तक ए एस नाथन, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ रावजी सोनवणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
शैक्षणिक वर्ष 2021 -22 मध्ये ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावी शाळांचे वर्ग दि.4 ऑक्टोबर 2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना सूचना देताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मास्क पुरवणे, शाळेतील डेस्क सॅनिटाईझ करणे या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांचे सहकार्य घ्यावे. तसेच शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लस घेणे अनिवार्य करावे, एक मूल एक झाड ही संकल्पना संपूर्ण शाळेत राबवणे, एका बेंचवर एक विद्यार्थी बसवणे, शालेय पोषण आहारावर लक्ष देण्या बाबत टाकसाळे यांनी सुचित केले.
ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सर्व शिक्षकांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नियमित व्यायाम करण्याचे आवाहन शिवानंद टाकसाळे यांनी आपल्या विनोदी व ग्रामीण शैलीतून जिल्ह्यातील शिक्षकांना केले.
0 Comments