परभणी ➡️ जिल्हयातील सर्व गायरानधारक आणि घरांच्या मालकी हक्कासाठी जमिन अधिकार आंदोलनाच्या वतीने आज मंगळवारी (दि.27) परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. (vnsnews24, feature )
या मोर्चाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. गायरान जमिनीवर मागासवर्गीय कास्तकारांनी शेतीसाठी केलेले अतिक्रमण तातडीने नियमानुकूल करून सातबारा उतारा देण्यात यावा. गायरान व सरकारी जमिनीवर बेघर लोकांनी बांधलेल्या घरांना संरक्षण देवून मालकी हक्काचे कबाले वाटप करावेत. झोपडपट्टी बसलेल्या जमिनी बळकाविण्यासाठी प्रयत्न करणार्या जमिन माफियांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करून झोपडपट्टीला संरक्षण द्यावे आणि त्यासाठी सरकारी सर्व मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मालमत्ता रजिस्टरला नोंद घेण्यात यावी.
दलित, मातंग-बौध्दांवर सातत्याने सुरू असलेले हल्ले आणि हत्या थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि हत्या करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. ऊसतोड मजूरांना साखर कारखाना आणि मुकादमांनी त्रस्त करून सोडले असून त्यातून अनेक उसतोड मजूर आत्महत्या करत आहेत, ह्या सर्व ऊसतोड मजूरांकडील सर्व थकबाकी माफ करावी यासह अन्य मागण्यांसाठी गायरान धारकांनी मंगळवारी सकाळी मोर्चा काढला होता.
यावेळी विश्वनाथअण्णा तोडकर, सुभाष लोमटे, विश्वनाथ गवारे, कॉम्रेड राजन क्षीरसागर, गणपत भिसे, गोविंद गिरी, बायजाबाई घोडे यांंच्यासह गायरान धारक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
..
0 Comments