परभणी ➡️ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवाने प्रगती साधली. ही प्रगती साधत असताना मानवाने भौतिक सुखाच्या हव्यासापोटी नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान ही केले. मानवाकडून असेच होत राहिले तर भावी पिढ्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याचे दायित्व आजच्या युवकांवर असल्याचे मत पर्यावरणतज्ञ प्रा.डॉ.दयानंद उजळंबे यांनी व्यक्त केले. (vnsnews-24, education, parbhani )
श्री शिवाजी महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने आयोजित भूगोल अभ्यास मंडळाचा कार्यक्रम शनिवारी (दि.२८) संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, डॉ.एम.एफ.राऊतराहे, विभागप्रमुख डॉ.बी.के. गायकवाड, प्रा.एस. टी. सोनूले आदींची उपस्थिती होती.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.उजळंबे पुढे म्हणाले, मानवाच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. दिवसेंदिवस माणूस लालसेपोटी निसर्गाला ओरबडण्याचे काम करीत आहे. वेळीच निसर्गाचे संतुलन केले नाही तर निसर्गचक्र बिघडून मानवाचे अस्तित्व नष्ट होऊ शकते. निसर्गाच्या संतुलनासाठी व्यापक आणि सरकारी स्तरावर धोरणात्मक निर्णय होऊन कार्य होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाले, विविध स्पर्धा परिक्षांच्या संदर्भाने भूगोल विषय महत्वाचा आहे. एवढंच नाहीतर भूगोल विषयाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी ही उपलब्ध होत आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांनी विषयाचे महत्व लक्षात घेता भविष्याच्या संधीचा वेध घ्यावा. यावेळी भूगोल अभ्यास मंडळाच्या सदस्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस टी. सोनूले, सूत्रसंचालन पल्लवी कदम तर आभार चैतन्य बोबडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजबवार अमितकुमार,वसंत खल्लाळ,मीरा हेंडगे, विजय गरुड,विजय गुंगाणे,आरती गरगडे,मोहिनी चौरे,योगेश शेटे आदींनी पुढाकार घेतला.
0 Comments