पूर्णा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (ता.28 ) तालुक्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळाच्या मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, सेतू सुविधा केंद्र चालक यांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी मार्गदर्शन केले. 14 ऑगस्ट पर्यंत तालुक्यात महा राजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सुधीर पाटील यांनी दिली.
सर्व मुख्याध्यापकानी आपल्या दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लागणारे शासकीय प्रमाणपत्र,जात,उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलीयर, शेतकरी असल्याचा दाखला, ईडब्ल्युएच आदी दाखले मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराजस्व अभियाना अंतर्गत सर्व यंत्रणा अथक परिश्रम घेवून विद्यार्थ्यांना सदर प्रकारची प्रमाणपत्र तात्काळ प्रशासन घरपोच देणार आहे.
सेतू सुविधा केंद्र तलाठी मंडळ अधिकारी आपल्या विद्यालयात येवून सेवा देतील त्याचा अधिकाधिक लाभ आजी माजी विद्यार्थी यांच्यासह पालकांना उपलब्ध करून द्या. तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी 15 ऑगस्टला समाधान दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. आयुष्यमान भारत योजनेसाठीचे पात्र लाभधारकांची नावे आधारलिंक करून घेण्याचे व कार्ड वाटप करण्याचे निर्देश त्यांनी सेतू सुविधा चालकांना दिले.
या पंधरवड्यात मयत शेतकऱ्यांच्या वारसांच्या नावे सातबारा लावून देणे. दिव्यांगाना अंत्योदय व विविध लाभ देणे, संजय गांधी व अन्य योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शिधा पत्रीका वाटप करणे, कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख मयत झाला असल्यास त्याच्या कुटुंबाला 20 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.
गरजूंनी संपर्क साधून लाभ घ्यावा. पंचायत समिती ,ग्रामपंचायत, कृषी अशा विविध विभागाच्या योजनाची अमलबजावणी प्रभावीपणे करून खऱ्या अर्थाने नागरिकांना समाधान व आनंद देण्यात येणार आहे. याकामी सर्वांनी सहकार्य व अधिक परिश्रम घ्यावेत असे आवाहन तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले. याच पद्धतीने वेगवेगळ्या वेळेत, तहसीलचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी ,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, कृषी विभागांच्याही बैठका घेण्यात येवून महाराजस्व अभियान यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला.
0 Comments