Ticker

12/recent/ticker-posts

HOME AD 02

जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण






परभणी ➡️ जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूल व  रस्ते हे खचलेले असून या कामासाठी तात्काळ 56 कोटी रुपयांना मंजुरी देत आहे. आता पाऊस पूर्णपणे थांबलेला असून  सर्व कामांना गती देऊन रस्ता वाहतुकीसाठी चांगला व्हावा. याअनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने  पूर्ण करावीत,  असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी ते बोलत होते . या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दि.म.मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, अतिवृष्टीने रस्त्याचे व पुलाचे नुकसान झालेले आहे . त्याच्या कामाकरिता 56 कोटी रुपयांना मंजुरी देत असून निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात करा. तसेच कामांना गती द्या, अशा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना  देऊन वर्षभरापूर्वीच काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे निदर्शनास येत असून  निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अहवाल पाठवावा. 

तसेच संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित अधीक्षक अभियंता श्री. धोंडगे यांना दिले. बैठकीच्या सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परभणी जिल्ह्यातील मंजूर कामे, लहान-मोठे पुलांची बांधकाम स्थिती, खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक खर्च, रस्ते विकासासाठी आवश्यक निधी, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेली कामे, इमारत दुरुस्तीची कामे, कोविड-19  अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली विविध कामे याबाबतची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व इतर विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टीतील रस्ते दुरूस्तीकरिता जिल्ह्यास 56 कोटींची तरतुद

अतिवृष्टीने तडाखा बसलेल्या रस्त्यांसह पुलांच्या दुरूस्तीकरिता या जिल्ह्यास 56 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.30) पत्रकार परिषदेतून दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून श्री.चव्हाण यांनी अतिवृष्टीने ग्रस्तक्षेत्रास राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातुन बांधकाम खात्यातील क्षतीग्रस्त रस्त्यांसह पुलांच्या कामाकरिता दोन हजार 635 कोटी रुपये मंजुर केले आहेत. त्यापैकी 550 कोटी रुपये मराठवाड्यातील रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकरिता उपलब्ध होणार असून त्यातून 56 कोटी रुपये परभणी जिल्ह्यातील क्षतीग्रस्त भागांच्या कामांकरिता खर्च होणार आहे, असे ते म्हणाले. या दोन तीन महिन्यात या कामांना मंजुरी, पाठोपाठ निविदांची प्रक्रियासुध्दा सुरू केली जाईल, अशी ग्वाहीही दिली. या कामांकरिता आणखीन निधी हवा असेल तर तोही उपलब्ध केला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, सुरेश नागरे यांच्यासह बांधकाम खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

पोलिस ठाण्यासह निवासस्थानासाठी पोलिस अधीक्षक व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात चर्चा 

जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने, विश्रामगृह, पोलिस मुख्यालयास चारही बाजुंनी संरक्षण भिंत बांधण्यासह परेड मैदानाचे लेवलिंग करण्याबरोबरच चारशे मीटरचा ट्रॅक उभारणीबाबत पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी शुक्रवारी (दि.30) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करत अधिकारी - कर्मचार्‍यांना आवश्यक असलेल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 563 निवासस्थाने बांधणे आवश्यक असून पोलिस अधिकारी - कर्मचार्‍यांसाठी विश्रामगृहाचीही यावेळी मागणी केली. तसेच बॉम्बशोधक व नाशक पतकासाठी प्रशासकीय इमारत, पोलिस मुख्यालय व पोलिस वसाहतीकरिता चारही बाजुनं संरक्षण भङिंत बांधणे, पोलिस मुख्यालयात पाण्याची नवीन पाईपलाईन टाकणे, पोलिस वसाहतीचे ड्रेनेज लाईन व सेप्टीक टँकची उंची वाढवणे, रस्त्यांचे डांबरीकरण वा काँक्रीटीकरण करणे, बंदोबस्तासाठी येणार्‍या अधिकारी - कर्मचार्‍यांकरिता राहण्यासाठी हॉलचे आवश्यक असून त्याचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, परेड मैदान व विक्रांत मैदानाचे लेवलिंग व 400 मीटर ट्रॅक तयार करणे, मुख्य परेड मैदानावर चारही बाजुने गॅलरी तयार करणे, मंचाचे सुशोभीकरण करणे, मैदानावर किल्ला तटबंदी सदृश्य भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. यावेळी अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित अधिकार्‍यांना याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे आदेश दिले.
     




 




Post a Comment

0 Comments