परभणी ➡️ विधानसभा मतदार संघातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराचा फटका बसला असून यामुळे हजारो हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले आहे. हातची पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अशा बिकट परिस्थितीत शासनाने तातडीची नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्याकरिता झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना केली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली.
बुधवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी परभणी तालुक्यातील धार, मांगणगाव, राहाटी, नांदगाव, दुरडी,समसापुर आदी गावांना भेटी देऊन या भागातील पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या समवेत जिल्हाधिकारी आँचल गोयल, तहसीलदार संजय बिरादार, जि. प. सदस्य दिनेश बोबडे, तालुकाप्रमुख नंदकुमार आवचार, मनपा गटनेते चंदू शिंदे, विश्वास कर्हाळे, बाबू फुलपगार, बाळासाहेब गोडबोले व शासकीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि जिल्हाधिकारी आ़ँचल गोयल यांनी पूरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली.
पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभेअसल्याचे उपस्थित सर्व शेतकऱ्यांना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सांगितले. झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी आँचल गोयल यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून शासनास शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करण्यासाठी भाग पाडू असे सांगितले .
0 Comments