ठाणे ➡️ दिव्या उमाशंकर यादव ही अवघ्या एका वर्षाची मुलगी खेळताना पाण्याच्या बादलीत पडली. यानंतर ती बेशुद्ध झाली. यादव कुटुंबीयांनी तिच्या उपचारासाठी सुरुवातीला खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, त्यांनी बाळाची नाजूक प्रकृती पाहून उपचारास नकार दिला. अखेर छत्रपती शिवाजी महाराज या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाचे प्राण वाचवण्याचा चमत्कार करुन दाखविला.
'देव तारी त्याला कोण मारी', या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी ठाण्यातील वाघोबा नगर पसिरात यादव कुटुंबीयांना आला. त्यांच्या कुटुंबातील दिव्या यादव ही वर्षभराची चिमुरडी घरात खेळत होती. त्यावेळी अचानक तोल जाऊन ती पाण्याच्या बादलीत पडली. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दिव्या लगेच बेशुद्ध पडली. दिव्याच्या घाबरलेल्या आईवडिलांनी सुरुवातीला तिला जवळच्या खासगी रुग्णालयता नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी बाळाची नाजूक परिस्थिती पाहून उपचारास नकार दिला.
अखेर भांबावलेल्या अवस्थेत दिव्याच्या आईवडिलांनी ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धाव घेतली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आल्यानंतर बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. रुग्णालयात भरती करताना बाळ बेशुद्ध अवस्थेत होते, त्याचे शरीर थंड पडले होते. बाळाला आकडी येऊन रक्तदाबही कमी झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाच्या तात्काळ उपचार सुरु करून फुफ्फुसातील पाणी काढले. बाळाला ऑक्सिजन लावून तब्येत स्थिर केली आहे. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
0 Comments